जळगाव : मध्य रेल्वेच्या मुंबई ते दिल्ली या मार्गावर अप व डाऊन हे दोनच मार्ग असल्यामुळे या दोन्ही मार्गावर दर दहा मिनिटाला गाड्या धावत असतात. गाड्यांची वर्दळ लक्षात घेता रेल्वे मंत्रालयाने तीन वर्षांपूर्वी भुसावळ ते मनमाड या तिसऱ्या रेल्वे मार्गाला मंजूरी दिली होती. यापैकी पहिल्या टप्प्यात भुसावळ ते भादली या तिसऱ्या मार्गाचे काम गेल्या आठवड्यात पूर्ण झाले असून भादली ते जळगाव या उर्वरित कामालाही नुकतीच सुरुवात झाली आहे. तर आता जळगाव ते शिरसोली या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला पिंप्राळा गेटपासून नुकतीच सुरुवात झाली आहे. या साडेअकरा किलोमीटरच्या मार्गावर ११ लहान पूल व ३ मोठे पूल उभारले जाणार आहेत.
भुसावळ रेल्वे प्रशासनाने पहिल्या टप्प्यात भुसावळ ते जळगाव या कामाला दोन वर्षांपूर्वी सुरुवात केली. यामध्ये सुरुवातीला भुसावळ ते भादली य साडेअकरा किलो मीटरचे काम हाती घेतले होते. वर्षभरात हे काम पूर्ण करुन, भादली ते जळगाव या कामालाही लगेच सुरुवात करण्याचे प्रशासनाचे नियोजन होते. मात्र, तरसोद, असोदा येथील शेतकऱ्यांना रेल्वेकडून पुरेसा मोबदला न मिळाल्यामुळे, हे काम थांबले होते. दरम्यान, गेल्या महिन्यात रेल्वे प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करुन, भादली ते जळगाव या उर्वरित मार्गाच्या कामालाही गेल्या आठवड्यात सुरुवात केली आहे.