जळगाव : गेल्या आठवड्याभरापासून जळगाव शहराचे तापमानात चढ-उतार होत असल्याने ४२.२ अंशावर तापमान स्थिरावले होते. मात्र, पुन्हा तापमानाचा पारा वाढून ४३ अंशावर येऊन पोहचला आहे. त्यामुळे जळगावकरांना मे हिटच्या चटक्यांचा प्रकर्षाने सामना करावा लागत आहे.
मार्च, एप्रिल महिन्यात तापमानाच्या पाऱ्याने चाळीशी पार केली होती. वादळी वारा , अवकाळी पाऊस अशा वातावरणात ६ ते ११ मे दरम्यान ४१ आणि ४२ अंशावर तापमान राहिले. तसेच १३ ते १७ मे दरम्यान ४२.४ अंशापर्यंत पारा पोहोचला होता. शनिवारी तापमानाचा पारा वाढल्याने ४३ अंशावर नोंद झाली . तर आज रविवारीही दुपारी १२ वाजेपर्यंत ४२ अंशापर्यंत तापमान जाऊन पोह्चल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. जळगाव शहराबरोबरच ग्रामीण भागात सूर्य जणू आग ओकत आहे. सकाळी ८ वाजेपासूनच सूर्याच्या किरणांचे चटके असह्य होत आहे. तर दुपारी १२ वाजेपर्यंत उन्हाच्या तीव्र झळांनी अंगाची लाही लाही होत असल्याने दुपारी १२ ते ४ वाजेच्यादरम्यान शहरातील रस्ते निर्मनुष्य राहत असल्याचे चित्र आहे. सध्या तापमानाचा पारा ४३ अंशावर पोहोचल्याने कुलर, एसीचा गारवा घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. तर संध्याकाळी शहरातील थंडपेय विक्री करर्णाया दुकानांवर गर्दी वाढू लागली आहे.