पाचोरा(प्रतिनिधी) : भुसावळ ते देवलाली / इगतपुरी पॅसेंजर गाडी लवकर सुरु करण्यात यावी. तसेच कोल्हापूर – गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस क्रमांक ०१०३९ / ४० च्या वेळेत १ डिसेंबर २०२० पासून बदल करून एक तास अगोदर करण्यात आल्याने भुसावळ विभागातील चाकरमानी व प्रवाशी वर्गाची गैरसोय रेल्वे बोर्डा कडून करण्यात आली आहे.
कोरोना काळ सहन करतानाच त्यात आता कुठे तरी नुकतीच ट्रेन सुरू झाली व आता पोटाची खळगी भरण्यासाठीची चांगली वेळ येईल असे शहरी व ग्रामीण जनतेला दिसत असतानांच रेल्वे बोर्डाने हा चुकीचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे ग्रामीण जनतेला आता सकाळी अगदी लवकरच घराबाहेर पडावे लागून अधिकचा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यात रोजचेच आरक्षित तिकीट करावे लागत असल्याने समस्येत भर पडतच असतांना हा घेतलेला निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी विनंती ट्रेन लाईव्ह प्रवाशी संघटनेतर्फे खासदार (जळगांव), डी. आर. एम. विभाग (भुसावळ), मुंबई जनसंपर्क कार्यालय व दिल्ली बोर्डाकडे ट्रेन लाईव्ह प्रवाशी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप पाटील यांनी केलेली आहे.