भुसावळ (प्रतिनिधी) : अनेक दिवसांपासून भुसावळ जनरल मॅनेजर यांनी हुकूमशाही करीत भुसावळ कंडारी रस्ता बंद केला आहे. शिवसेना, ग्रामपंचायत कंडारी, संयुक्त कृती समिती ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ यांनी वेळोवेळी जनरल मॅनेजर यांना चर्चा करण्यासाठी वेळ मागितली. या सर्वांनाच भेटीची वेळ दिली नाही तसेच फोनवर चर्चा करण्यासाठीसुद्धा तयारी दर्शवली नाही.
ऑर्डनन्स फॅक्टरी, रेल्वे कर्मचारी, तसेच कंडारी परिसरातील महिला, जेष्ठ नागरिक, विद्यार्थी अश्या ५००० नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दीड किलोमीटरचा फेरा वाढल्याने सर्वसामान्यांना पेट्रोलवर जास्त खर्च लागतोय याची काळजी जनरल मॅनेजर यांना नाही म्हणून आज भुसावळ उपविभागीय कार्यालयात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ऍड. श्याम श्रीगोंदेकर, तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, शिक्षकसेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख प्राचार्य विनोद गायकवाड, युवासेनेचे तालुका समन्वयक सुरेंद्र सोनवणे यांनी निवेदन सादर केले.
भुसावळ फॅक्टरी तर्फे उत्सर्जित झालेले सांडपाणी, घाण कचरा हा कंडारीकडे जातो, फॅक्टरीत असलेले कर्मचारी, रहिवासी किराणा, मेडिकल, एटीएम दवाखाने तसेच धार्मिक अंत्यविधीसाठी कंडारी भागात येत असतात. या सर्व सुविधा बंद करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
संरक्षणमंत्र्यांकडे तक्रार दाखल:
कंडारी ग्रामपंचायतीत या भागातून तीन सदस्य निवडून येतात म्हणजे हा भाग महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली आहे. जनरल मॅनेजर परराज्यातील असल्याने त्यांना स्थानिक मराठी माणसाच्या त्रासाशी काहीही देणेघेणे नाही. एका प्रकारची हिटलर शाही फॅक्टरी परिसरात सुरू आहे म्हणून देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे, असे प्राचार्य विनोद गायकवाड यांनी कळविले आहे.