चोपडा(प्रतिनिधी) तालुक्यातील बहुतांश शेतकरी पूर्वहंगामी कापूस लागवडीच्या तयारीत आहेत. परंतु शासनाच्या कृषी विभागामार्फत २५ मे नंतर प्रमाणित बियाणे पुरवण्यात येईल असे सांगण्यात येऊन कापसाची लागवड १ जून नंतरच करावी,अशाही सूचना दिलेल्या आहेत. हा आदेश झुगारून काही बाहेरील व्यापार्यांनी बाजारात बोगस कंपनीचे बीटी बियाणे विक्रीस आणून शेतकऱ्यांची फसवणूक व लुबाडणूक करीत असल्याचे समजते.अशी स्पष्टोक्ती चोपडा क्रुषि उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक जगन्नाथ टि.बाविस्कर यांनी या पत्रकान्वये केली आहे.
चोपडा तालुक्यात कापूस लागवडीसाठी सुमारे एक ते सव्वा लाख बियाण्यांचे पॉकीट लागतात. बाजारात अजून ओरिजनल बीटी बियाणे उपलब्ध नाहीत. तरीही बाहेरील राज्यांकडून तालुक्यात बोगस बीटी बियाणे दाखल होवुन आजपावेतो सुमारे ३० ते ३५ हजार पाकिटे विक्री झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.अजूनही तेवढीच पाकिटे यापुढिल ८ ते १० दिवसात विक्री होऊ शकतात.तसेच शासनाच्या कृषी विभागाने प्रमाणित केलेले बियाणे बाजारात येईल,तोपर्यंत ७० टक्के बोगस कंपनीचे बीटी बियाणे लागवड होऊ शकते. या बोगस बियाण्यांची प्रति पॉकीट मुळ किंमत ३०० ते ४०० रूपये असल्याचे समजते पण काळ्याबाजारात तेच बियाणे शेतकऱ्यांना प्रति पॉकीट १२०० ते १५०० रुपयांपर्यंत विक्री होत असल्याची चर्चा आहे.
शासनाचा कृषीविभाग हा शेतकऱ्यांसाठीच आहे.व बाजारातील कृषीकेंद्रे ही सुद्धा कमी वेळेत व्यापारी बनलेल्या शेतकऱ्यांचीच आहेत. यावरून असे दिसते की शेतकरीच शेतकऱ्यांची दिशाभुल करून फसवणूक करीत आहेत.ह्याबाबतीत शेतकरीही तेवढाच जबाबदार आहे.यासाठी कृषी विभागाने कंबर कसुन अशा बोगस बीटी बियाणे बनविणार्या कंपन्या व व्यापार्यांवर कारवाई करून हे कुठेतरी थांबविले पाहिजे.शेतकऱ्यांनी सुद्धा वेळीच खबरदारी घेऊन बोगस बियाण्याची लागवड न करता भविष्यातील होणारे नुकसान टाळावे.असेही आवाहन गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ टि.बाविस्कर यांनी केलेले आहे.