फटाकेमुक्त दिवाळीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव ठेवणार, राजेश टोपेंचा मोठा निर्णय

0

मुंबई । फटाकेमुक्त दिवाळीसाठी राज्यात फटाक्यांवर बंदी आणण्याचा मंत्रिमंडळात प्रस्ताव ठेवणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यावर कोरोनाचं महाभयंकर संकट घोंघावत आहे. त्याच पार्श्वभूमीवर फटाक्यांना बंदी घालण्याची भूमिका आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी मांडली आहे.

“फटाकेमुक्त दिवाळी आपल्याला कशी साजरी करता येईल ही मानसिकता आतापासून ठेवणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांकडे आणि कॅबिनेटमध्येही मी याबाबत आग्रह धरणार आहे”, अशी माहितीही त्यांनी दिली आहे. “फटाक्यांच्या धुरात टॉक्झिसिटी खूप असते. थंडीमुळे तो धूर वर जाऊ शकणार नाही. त्यामुळे श्वसनाला अधिक बाधा निर्माण होऊ शकते. यासंदर्भात अधिक काळजी घेतलेली बरी आहे, यासाठीच दिवाळीपूर्वीपर्यंत हा नियम लागू करण्याचा माझा आग्रह राहील”, असे राजेश टोपेंनी सांगितले आहे.

याशिवाय दिवाळी साजरी करताना गर्दी टाळा, खबरदारी घेऊन महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी नागरिकांना केले. सध्या कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार असून, फिव्हर सर्व्हेलन्स प्रभावीपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.