यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क
तालुक्यातील किनगावात एका सेतु सुविधा केंद्र चालकाने थेट यावल तहसिलदारांचे पीएम किसान योजनेचे खाते हॅक केले व तब्बल ३८ जणांची नोंदणी त्यात केल्याचे उघड झाल्याने जिल्ह्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासुन यावल तहसिल कार्यालयात पीएम किसान योजना संदर्भातील नोंदी महसुल विभागाच्या वतीने थांबवण्यात आल्या होत्या असे असतांना ही ३८ नोंदी झाल्या कशा याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी संशय व्यक्त करून या संदर्भात चौकशी करावी असे सुचित केल्यावर हा प्रकार निदर्शनास आला तेव्हा या प्रकरणी एका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील तहसिल कार्यालयातील पीएम किसान योजना विभागाचे कार्यालयीन लिपीक दिपक शांताराम बाविस्कर यांनी पावल पोलीसात दिलेल्या फिर्यादीनुसार, तीन वर्षापासून तहसिल कार्यालयात त्यांच्याकडे महसुल सहाय्यक म्हणुन कामकाज आहे व त्याअनुषंगाने ते मागील दोन वर्षापासुन पीएम किसान सन्मान निधी योजनेचे कामकाज ते नियमितपणे पाहत आहेत.
सदर योजनेत शेतकऱ्यांचे नोंदणी करणे (रजिस्ट्रेशन), आधारकार्ड वरील नाव दुरुस्ती करणे, चुकीचा खाते क्र.असल्यास ते दुरुस्त करणे, शेतकऱ्यांचे शिवार बदल करणे आदी कामे ते ऑनलाइन पीएम किसान सन्मान योजनेच्या संगणकीय संकेतस्थळावर तहसिलदारांच्या आदेशाने करत होते. मात्र दिनांक १४ ते ३० सप्टेंबर या कलावधीत तहसिलदार महेश पवार यांच्या सुचने वरून त्यांनी काम बंद ठेवले होते व संकेतस्थळाचे लॉगीन व आयडी त्यांना तहसिलदार महेश पवार यांच्या परवानगीनेचं उपलब्ध् व्हायचे म्हणुन ते देखील बंद होते.
दरम्यान दिनांक १४ ते ३० सप्टेंबर दरम्यान नोंदणी बंद असतांना या पीएम किसान योजनेच्या संकेतस्थळावर ३८ शेतकऱ्यांची नोंदणी झाल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या निदर्शनास आली व त्या अनुषंगाने त्यांनी या बाबत थेट यावलचे तहसिलदार महेश पवार यांना विचारणा केली, तेव्हा तहसिलदारांच्या लॉगीन आय-डी या पोर्टल वर परवानगी शिवाय संकेतस्थळ हँक करून ललित नारायण वाघ रा.किनगाव ता.यावल यांना कोणतेही अधिकार नसतांना ३८ शेतकऱ्यांच्या नोंदी टाकल्याचे समोर आले व या प्रकरणी आयटी अँक्ट सह विविध कलमान्वये ललीत वाघ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलिस निरिक्षक सुधीर पाटील, उपनिरिक्षक जितेंद्र खैरनार, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे करीत आहे.
आधीही नोंदी केल्याचा संशय- तहसिलदार महेश पवार
पैसे घेवुन पी एम किसानच्या नोंदी केल्या जात असल्याच्या तक्रारी येत होत्या, म्हणुन आपण आपल्याच कर्मचाऱ्यांवर संतप्त झाले होतो. काम सध्या बंद ठेवण्याच्या सुचना केल्या तेव्हा ३८ नोंदी झाल्याचे समोर आले व नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना बोलावुन त्यांचे जवाब घेतले असता नोंदणी करीता किनगाव सेतु केंद्रात प्रत्येकी एक हजार रूपये घेतल्याचे त्यांनी सांगितले. तर बाहेरील व्यक्ती करीत असलेल्या गैरप्रकारात महसुल प्रशासन बदनाम होते. असे तहसिलदार महेश पवार यांनी सांगीतले.