पालकमंत्री ना. गुलाबराव पाटलांचा राज्यपालांना टोला ; म्हणाले….

0

जळगाव प्रतिनिधी : राज्यपाल कोट्यातून आमदारकीसाठी ज्या बारा लोकांची नियुक्ती रखडली आहे, त्यांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. याबाबत राज्यपालांनी निर्णय लवकर घेतला पाहिजे होता. नियुक्तीचा अधिकार त्यांना आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते तथा सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यपालांवर टीका केली आहे. राज्यपालांचे सचिव आता न्यायालयाला याबाबत काय उत्तर देतात, त्याची उत्सुकता मलाही लागली असल्याचेही पाटील म्हणाले.

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील हे शनिवारी दुपारी जळगावात होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरात राज्याला केलेली मदत याबाबत प्रतिक्रीया व्यक्त केली.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगीतले की, राज्यपाल नियुक्त आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीबाबत न्यायालयाने राज्यपालांच्या मुख्य सचिवांना विचारणा केली आहे. त्याचे उत्तर दोन आठवड्यात मागितले आहे. आता ते न्यायालयाला काय उत्तर देतात, याची तुमच्याप्रमाणे मलाही उत्सुकता आहे. राज्यपाल नियुक्त आमदार करणे ही काही आजची गोष्ट नाही. ही बाब परंपरागत सुरू आहे. आमदार मग तो विधानसभेचा असो किंवा विधानपरिषदेचा, प्रत्येकाच्या डोक्यात विकासाच्या बाबतीतच नव्हे तर राज्याला सूचना देण्याच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारची कल्पना असते. त्यामुळे आमदारांच्या नियुक्तीला महत्त्व दिले पाहिजे. आपला देश विविध भाषा आणि प्रदेशात विभागला आहे. म्हणून कोणत्याही विधानसभा क्षेत्रात लोकप्रतिनिधींच्या जागा रिक्त राहणे लोकशाहीसाठी योग्य नाही, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

तोक्ते चक्रीवादळामुळे गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात देखील मोठे नुकसान झाले. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फक्त गुजरातला मदत केली. यावरून राज्यात सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याबाबत बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, ज्याप्रमाणे गुजरातला मदत केली तशी महाराष्ट्रालाही मदत केली पाहिजे होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही कोकणात पाहणी दौरा केला आहे. त्यामुळे आता त्यांनी गुजरातप्रमाणे महाराष्ट्राला पण मदतीसाठी पाठपुरावा करावा, असा टोला फडणवीसांना लगावला. केंद्राने मदत करताना राजकारण न करता देशाचा नागरिक म्हणून मदत करावी, अशी अपेक्षाही मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.