कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पवार कुटुंबाची चिंता करू नये तसंच वैयक्तिक किंवा घराण्यावर आरोप करण्यापेक्षा दुष्काळ, शेतकरी आत्महत्यांवर बोला, असं प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मोदींना दिलंय. ते कोल्हापुरात आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक आणि राजू शेट्टींच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात बोलत होते.
मंगळवारी वर्धा येथील प्रचार सभेत मोदींनी पवार आणि गांधी कुटुंबावर टीका केली होती. या टीकेनंतर पवार कुटुंबातील सर्वानीच मोदींच्या विधानाचा समाचार घेत पवार कुटुंबाची काळजी मोदींनी करू नये, अशी प्रतिक्रिया दिल्या. मोदी पुन्हा सत्तेवर आल्यास राज्यघटनेत बदल करून एक मताचा अधिकार उदध्वस्त करतील अशी भीती व्यक्त करून पवारांनी गांधी घराण्याच्या त्यागाचं आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाचं कौतुक केलं. गांधी घराण्याच्या त्यागाची किंमत तुम्हाला कळली नाही तरी ती देशाला माहीत असल्याचं पवारांनी म्हटलंय. आम्हाला आमच्या आईनं योग्य ते संस्कार दिले आहेत त्यामुळे नरेंद्र मोदींनी वैयक्तिक आरोप केले असले तरी मी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वैयक्तिक आरोप करणार नाही, असं म्हणत शरद पवारांनी पलटवार केलाय.
‘मोदी जिथं जात आहेत तिथं खाजगी टीका करत आहेत. परंतु मी मात्र असं करणार नाही कारण मी माझ्या आईनं दिलेल्या संस्कारांनी प्रभावित आहे. वैयक्तिक टीका आमच्या संस्कृतीत बसत नाही’ असं म्हणतानाच पंतप्रधानांना राष्ट्रवादीच्या कौटुंबिक कलहाबाबत चिंता करण्याची गरज नसल्याचंही त्यांनी म्हटलं.