फैजपूर प्रतिनीधी: न्हावी नाथमंदिर ( विठ्ठल मंदिर ) येथे सुरू असलेल्या ज्ञानेश्वरी ग्रन्थराज पारायण संकीर्तन सप्ताहामध्ये शुक्रवार रोजी आशिर्वादरुपी सदिच्छा भेटीत महामंडलेश्वर श्री जनार्दनहरिजी महाराज यांनी आपल्या मधुर वाणीतून केलेल्या निरुपणाप्रसंगी अक्षरशः भाविक गण मंत्रमुग्ध झाले .महाराज यांनी पारायणाचे महत्व विषद करून पूर्वीचे पारंपारिक साहित्य जाते ,( दळण दळायाचं ), सुपडे यांचा दाखला देऊन महाराज म्हणाले की जात्याचे एक पाते स्थिर राहते आणि दुसरे पाते फिरते . तसेच आपल्या मनाला स्थिर ठेवून शरीराला फिरते ठेवा .
शरीराला स्नान ,मनाला ध्यान , व बुध्दीला ज्ञानाची गरज असते हे लक्षात ठेवा . प्रभूच्या नामोच्चाराने , नामस्मरणाने उच्च सुख प्राप्त होतेच परंतु त्यामुळे जीवनात सकारात्मकता येऊन सद् गती देखील प्राप्त होते . नकारात्मकतेमुळे आपल्या तनमनामध्ये जी अशांती निर्माण होते ती दूर करण्यासाठी भगवंताचे नामस्मरण अत्यंत प्रभावशाली आहे .
नाम तेरा जपते है हर दम,नाम तेरा सुखकारी है !आये है तेरे चरणो मे,चरण शरण हितकारी है !! या प्रकारे विविध संत साहित्याचे दाखले देऊन महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी आपल्या प्रवचनातून संतसाहित्य,संस्कृती,धर्म यांचे महत्व विषद केले.