‘देवमाणूस’ लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सर्वात जास्त चर्चेत असलेल्या  झी मराठी वाहिनीवरील ‘देवमाणूस’  या मालिकेने आपल्या वेगळ्या कथानकामुळे लोकप्रियतेचं शिखर गाठलं. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आणि प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दर्शवली. पण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आणि त्याजागी एक नवीन गूढ रहस्यमय मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका १६ ऑगस्टपासून रात्री १०.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या नवीन मालिकेचं नाव आहे ‘ती परत आलीये’. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. ज्येष्ठ अभिनेते विजय कदम या मालिकेत एका वेगळ्या आणि लक्षवेधी भूमिकेत दिसणार आहेत.

 

https://www.instagram.com/p/CReJ3bzD3Im/?utm_source=ig_web_copy_link

 

विजय कदम हे बऱ्याच कालावधी नंतर टीव्हीवर पुनरागमन करणार आहेत. प्रोमोमध्ये प्रेक्षकांनी पाहिलं की विजय कदम एका परिसरात गस्त घालत आहेत आणि त्या परिसरामध्ये हत्या होते त्यामुळे सावध राहा असा इशारा देताना दिसत आहेत. नक्की ही भानगड काय आहे? या मालिकेत अजून कोण कलाकार असणार आहेत? ही सर्व माहिती अजूनही गुलदस्त्यात आहे.  या मालिकेचं लेखन ‘देवमाणूस’ या लोकप्रिय मालिकेचे लेखक स्वप्नील गांगुर्डे यांनीच केलं आहे. त्यामुळे ही मालिका देखील प्रेक्षकांना खिळवून ठेवणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

या मालिकेबद्दल बोलताना विजय कदम म्हणाले, “या मालिकेत एक रहस्यमय भागातील गूढ प्रेक्षकांना पाहायला मिळेल. इकडे आलेल्या लोकांचं काही रहस्य आहे का? ती परत आलीये म्हणजे नक्की कोण? या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना लवकरच मिळतील. एका रहस्यमय मालिकेत काम करताना मी खूप उत्सुक आहे. माझी भूमिका नक्की काय आहे हे सगळ्यांना लवकरच कळेल. प्रेक्षक या भूमिकेवर प्रेम करतील अशी माझी खात्री आहे.”

Leave A Reply

Your email address will not be published.