निपाणे, ता.एरंडोल (वार्ताहर) : सध्या नैसर्गिक वातावरणात बदल झाला असून ढगाळ वातावरण निवरुन गेल्या ५- ६ दिवसांपासून बोचऱ्या थंडीची चाहूल लागली आहे त्यामुळे सकाळच्या प्रहरी जिकडे तिकडे शेकोट्या पेटू लागल्या आहेत दिवसेंदिवस थंडी वाढू लागल्याने रब्बी हंगामातील पिकांवर दड पडू लागला आहे त्यामुळे पिकांना सदर वातावरण पोषक ठरु लागले आहे यावर्षी दमदार पाऊस झाल्याने नदी नाले वाहू लागले असून बांध बंधारे देखील पाण्याने भरुन वाहू लागले आहेत.
त्यामुळे शेत जमिनीतील विहिरींच्या पाण्याची पातळीत वाढ झाली आहे तसेच यंदा ही गिरणा धरण शंभर टक्के भरल्याने नदी परीसरातील शेतकरी वर्गात रब्बी बागायती करण्याबाबत उत्साह संचारला असून रब्बी हंगामाचे वेध लागले आहेत त्यासाठी शेतकऱ्याने कंबर कसली असून आपला मोर्चा शेती तयार करण्याकडे वळवला आहे काही शेतकरी सध्या दादर हरबरा पेरणी करत असल्याचे दिसून येत आहेत मात्र सध्या पडत असलेली थंडी रब्बी पिकांना निश्र्चितच फायद्याची ठरणार आहे अशी चर्चा शेकोटींवर होवू लागली आहे