नवी दिल्लीः आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी केवडिया येथे पोहोचले, त्यांनी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ ला श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पुलवामा हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खानच्या मंत्र्याने दिलेल्या कबुलीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला.
आपण नेहमीच हे लक्षात ठेवले पाहिजे की सगळ्यांचे सर्वोच्च हित म्हणजेच देशाचे हित आहे. जेव्हा आपण प्रत्येकाच्या हिताचा विचार करतो, केवळ तेव्हाच आपण प्रगती करू शकतो. मी अशा राजकीय पक्षांना विनंती करतो की, देशाच्या सुरक्षेच्या हितासाठी, आमच्या सुरक्षा दलाच्या मनोबलासाठी कृपया असे राजकारण करू नका आणि अशा गोष्टी टाळा. आपल्या स्वार्थासाठी आपण जाणूनबुजून किंवा नकळत देशविरोधी शक्तींच्या हातात हात खालून देशाशी खेळू नका, असं म्हणत मोदींनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे.
काँग्रेसचे नाव न घेता पंतप्रधान मोदी म्हणाले, आपल्या राजकीय स्वार्थासाठी हे लोक कोणत्या थराला जाऊ शकतात, हे विरोधकांनी दाखवले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर झालेले राजकारण याचे मोठे उदाहरण आहे. तेव्हा काय-काय बोलले गेले, कशा प्रकारची विधाने केली गेली, हे देश कधीही विसरू शकत नाही.
यापूर्वी शेजारच्या देशातून आलेल्या बातम्या, तेथील संसदेत ज्या पद्धतीने सत्य स्वीकारले गेले आहे, त्याद्वारे या लोकांचे खरे चेहरे देशासमोर आले आहेत. हे लोक त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी किती खालच्या थराला जाऊ शकतात, याचे पुलवामा हल्ल्यानंतर केलेले राजकारण हे उत्तम उदाहरण आहे. पुलवामा हल्ल्यादरम्यान देशात अहंकारी राजकारण सुरू होते. त्यावेळी केली गेलेली विधानं देश विसरू शकत नाही. राष्ट्रावर असे प्रसंग ओढावलेले असतानाही स्वार्थी आणि अहंकारी राजकारण केले गेले, ते देश कधीही विसरणार नाही.