धर्माबाद (प्रतिनिधी) :येथील रत्नाळी व बाळापुर येथील तलाठी व मंडळ अधिकारी नामदेव माळोदे यांनी संगनमत करून अनेक नियमबाह्य पद्धतीने सातबाराऱ्यावर मालमत्तेची नोंद घेतल्याचे उघडकीस आले आहे.तसेच येथील तलाठी कार्यालयात दलालांचा सुळसुळाट झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे मालमत्ता धारकांची आर्थिक लुट होत आहे.
तालुक्यातील सर्व तलाठी संबंधित सज्यावर राहणे बंधनकारक आहे. परंतु तालुक्यातील अनेक तलाठी धर्माबाद येथे आपले कार्यालय थाटून बसले आहेत.परंतु शेतकरी, मालमत्ता धारक व शाळकरी मुला,मुलींना अनेक लहान-मोठे कामासाठी तलाठी कार्यालयाकडे खेटे मारावे लागत आहे. परंतु तलाठी कार्यालयात संबंधित तलाठी मात्र हजर राहत नसल्यामुळे अनेकांचा हिरमोड होत असल्यामुळे तलाठीच्या कार्यपद्धतीवर संतापाची लाट उसळली आहे.तसेच वारंवार नागरीक तलाठी कार्यालयांकडे खेटे मारत असल्याचे पाहून कार्यालयाच्या परीसरात असलेले दलाल मंडळी संबंधित नागरीक व शेतकऱ्यांना तुमचे काय काम आहे,सांगा मी करून देतो,असे सांगून आर्थिक तडजोड करीत आहेत.व काही तलाठी सुध्दा सांगत आहेत,कि मी कामानिमित्त बाहेर गावी आलो आहे, तुम्ही माझ्या माणसाला भेटा,काम करून टाकून असे उत्तर ऐकवयास मिळत आहे.तसेच मालमत्तेचे नोंद सातबाराऱ्यावर करण्यासाठी तलाठी कार्यालयात दाखल केलेल्या संचिकेची पोच पावती किंवा रिशूड काॅपी संबंधित तलाठी मालमत्ता धारकांना देत नाहीत.
ठराविक रक्कम दिल्यानंतरच तलाठी सदरील कामाची नोटीस काढत असल्याचे मालमत्ता धारक खुलेआम बोलवून दाखवित आहेत.व मंडळ अधिकारी नामदेव माळोदे हे मुख्यालयी राहत नसून त्यांनी उंटावर बसून शेळ्या राखत आहेत.तसेच अनेक मालमत्तेच्या तलाठ्यांनी सातबाराऱ्यावर नोंदी घेण्यासाठी नोटीस काढून अनेक महीने उलटले आहेत.तरीही मंडळ अधिकारी नामदेव माळोदे हे सदरील कामास मंजूरी देण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत.त्यामुळे तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे शहरातील जनता वैतागली आहे.परंतु वरीष्ठ अधिकाऱ्यांचा त्यांना अभय मिळत असल्यामुळे त्यांचे मनोबल वाढले आहे.व मालमत्ता धारकांची मोठ्या प्रमाणावर दलाला मार्फत आर्थिक लुट होत आहे. त्यामुळे संबंधित भ्रष्ट तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या विरोधात छावा संघटना लवकरच तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे छावाचे तालुकाध्यक्ष शिवराज पाटील चोळाखेकर यांनी बोलताना सांगितले आहे.