…तर मशिदीच्या निर्मितीसाठी ट्रस्टची स्थापना का नाही? शरद पवार

0

लखनौ : अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारकडून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास (ट्रस्ट)ची स्थापन करण्यात आली आहे. याचा संदर्भ पकडत लखनऊ येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारला मशिदीच्या निर्मितीसाठी तुम्ही ट्रस्टची स्थापना का करू शकत नाही? असा प्रश्न केला आहे. याचबरोबर देश सर्वांचा आहे, सर्वांसाठी आहे, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

लखनौ येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या राज्यस्तरीय संमेलनाप्रसंगी शरद पवार बोलत होते. शरद पवार म्हणाले, विरोधी पक्षातील सर्व पक्षांनी मिळून भाजपच्या विरोधात निवडणूक लढवली पाहिजे. केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकार राज्यातील भारतीय जनता पार्टी (भाजप) चं सरकार लोकांना धर्माच्या आधारे वेगवेगळं करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

ते म्हणाले की, ज्या प्रमाणे अयोध्येत राम मंदिर निर्माण करण्यासाठी ट्रस्ट बनवून आर्थिक मदत दिली जात आहे, त्याचप्रमाणे मशीद बनवण्यासाठी देखील ट्रस्ट तयार करुन आर्थिक मदत दिली जावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली.

दरम्यान, प्रफुल्ल पटेल म्हणाले, सर्व पक्षांनी राम मंदिर प्रकरणी एकच भूमिका घेतली होती. जो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असेल तो मान्य केला जाईल. कोर्टाचा निर्णय आला आणि तो सर्वांनी मान्य देखील केला. शांतता आणि बंधुभाव सर्वांनाच हवा आहे. हा वाद कायमचा संपावा अशीच सर्वांची इच्छा आहे, असे पटेल म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.