नवी दिल्ली : करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात दुसरा लॉक डाऊन सुरू असून हा लॉकडाऊन ३ मेला संपणार आहे. हा लॉकडाउन संपण्यास सहा दिवस उरले असताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत लॉकडाउन उठवण्यासंदर्भात मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. या बैठकीत पंतप्रधानांना राज्यांमधील परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचबरोबर देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल काळजी करण्याचं कारण नसल्याचं सांगत राज्यांना आश्वस्त केलं.
३ मे रोजी लॉकडाउनची मुदत संपत आहे. त्यानंतर करावयाच्या उपाययोजनासंदर्भात मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन केलं. राज्यांमधील ज्या जिल्ह्यांमध्ये हॉटस्पॉट आहेत. त्या जिल्ह्यांमधील लॉकडाउन ३ मे नंतरही कायम ठेवण्याची सूचना मोदी यांनी केली आहे. त्याचबरोबर ज्या जिल्ह्यांमध्ये करोनाचे रुग्ण नाहीत वा जे जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत. अशा जिल्ह्यांमधील लॉकडाउन उठवण्यासंदर्भात मोदी यांनी सूचना केल्या आहेत.
दरम्यान, देशातील लॉकडाउन वाढवावे असे १० राज्यांनी पंतप्रधानांना सांगितले. यात दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, गुजरात ही राज्ये आहेत. तसेच राजधानी दिल्लीतील लॉकडाउनवर ३ मे नंतरच निर्णय घेणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे. लॉकडाउन उठवल्यानंतर राज्यांना आपली रणनीती तयार करावी लागेल, अशाही सूचना मोदी यांनी दिल्या आहे.