नवी दिल्ली : देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 15,968 नवे रुग्ण आढळून आले आहेत. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. तर 465 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दरम्यान, भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 4,56,183 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 14,476 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. बुधवारी (24 जून) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 15,968 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या चार लाख 56 हजारांवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 14 हजारांवर पोहोचला आहे.
देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 183022 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 258685 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामुळे कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात इतर देशांच्या तुलनेत भारत यशस्वी झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत.