चाळीसगाव – संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. चाळीसगाव येथे भारतीय जनता पक्ष व आमदार मंगेश चव्हाण यांच्या अंत्योदय जनसेवा कार्यालयात संविधान दिनाच्या निमित्ताने संविधान पूजन व २६/११ मुंबई वरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवान व निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी आमदार मंगेश चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, आरपीआय जिल्हाध्यक्ष नगरसेवक आनंद खरात, भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, भाजपा अनुसूचित जाती आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुशील वानखेडे, नगरसेवक महेंद्र मोरे, माजी जि प सदस्य शेषराव पाटील, सरचिटणीस अमोल नानकर, चिटणीस विजय जाधव, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुनील पवार, डॉ महेंद्र राठोड, किशोर रणधीर यांच्यासह जनसेवा कार्यालयातील जनसेवक व लाभार्थ्यांनी सामूहिक संविधानाचे वाचन केले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
संविधानाच्या मूलभूत तत्वांमुळे आज भारत एकसंध असून जगातील सर्वात मोठी लोकशाही टिकून आहे,
संविधानाचे पालन करणे व लोकशाही टिकविणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे,
चाळीसगाव तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने सर्वाना संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो व आजच्याच दिवशी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करतो अश्या भावना आमदार चव्हाण यांनी व्यक्त केल्या.