६६ पैकी ४३ ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा, ६ ग्रामपंचायत संमिश्र
आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयाला यात्रेचे स्वरूप…
स्थानिक पातळीवरील सर्वपक्षीय आघाडीच्या पॅनलमध्ये देखील भाजपाचे सर्वाधिक ग्रामपंचायत सदस्य विजयी
चाळीसगाव : तालुक्यातील ६६ गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत. यावेळी पहिल्यांदा राष्ट्रवादी-शिवसेना- कॉंग्रेस महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना रंगला होता. त्यात भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील गटाने ४३ ग्रामपंचायतींवर बहुमत मिळवत भाजपचा झेंडा फडकवला आहे तर ६ ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक भाजप पदाधिकारी व इतर पक्षाचे पदाधिकारी यांनी मिळून बनविलेल्या पॅनल चे वर्चस्व आहे. या ६ ग्रामपंचायतींमधे देखील स्थानिक ग्रामपातळीवर सर्व पक्षांचे संमिश्र पॅनल असल्याने त्यात देखील भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत तसेच यापूर्वीच आमदार मंगेश चव्हाण यांच्या आवाहनानुसार तालुक्यातील ९ ग्रामपंचायत या बिनविरोध झाल्या असल्याने चाळीसगाव तालुक्यात भाजपचाच वरचष्मा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. विशेषतः बंजारा तांड्यामध्ये मागील निवडणुकीच्या तुलनेने भाजपाने जोरदार मुसंडी मारल्याचे दिसत आहे.
दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या विजयी उमेदवारांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या अंत्योदय जनसेवा कार्यालयात भेट देत जल्लोष केला. यावेळी सर्व विजयी उमेदवारांचे स्वागत आमदार मंगेश चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, माजी तालुकाध्यक्ष के बी दादा साळुंखे, पंचायत समितीचे गटनेते संजय भास्करराव पाटील, माजी सभापती दिनेशभाऊ बोरसे, शहराध्यक्ष घृष्णेश्वर तात्या पाटील, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, पंचायत समिती सदस्य पियुषदादा साळुंखे, तालुका सरचिटणीस अमोल चव्हाण, शहर सरचिटणीस जितेंद्र वाघ, अमोल नानकर, योगेश खंडेलवाल, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुनील पवार, शहराध्यक्ष भावेश कोठावदे आदी उपस्थित होते.
आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयाला यात्रेचे स्वरूप…
मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाचे विजयी उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपा कार्यालयात जमल्याने यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. सर्व विजयी उमेदवारांचा पुष्पहार व गुलाल टाकून सत्कार करण्यात आला.
भारतीय जनता पक्षाच्या ४२ ग्रामपंचायतींवर भाजपाचे वर्चस्व
तालुक्यातील टाकळी प्रदे, पिंप्री खु, नांद्र – काकळणे, अलवाडी, देशमुखवाडी, तामसवाडी, खडकी बु., तांबोळे, बिलाखेड, चितेगाव, कोदगाव – गणपूर, टाकळी प्रचा, तरवाडे, खरजई, भोरस, कळमडू, कुंझर, पोहरे, खेडी खु., दस्केबर्डी, रहीपुरी, बहाळ, टेकवाडे, पिंप्री बु प्रदे, देवळी, डोणदिगर, तमगव्हाण, वरखेडे, भउर, लोंढे, भवाळी, मुंदखेडे बु., वाघडू, हातले, मजरे, जामडी प्र.बा., रोकडे, बेलदारवाडी, बोढरे, जुनोने, शिंदी, पाटणा, ओढरे या ग्रामपंचायतींवर भाजपाने झेंडा रोवला असून पिलखोड, सायगाव, हातगाव, रोहिणी, पिंपळगाव, राजदेहरे या ग्रामपंचायतींमधे भाजपा व इतर पक्षाच्या स्थानिक आघाड्यांचे बहुमत असल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम सर यांनी दिली.