चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
गौताळा अभयारण्याच्या पर्यावरण संवेदनशिल क्षेत्रामध्ये कार्यान्वित फर्मी सोलर फार्मस प्रा. लि. व जेबीएम सोलर म. प्रा. लि. नवी दिल्ली या खाजगी सोलर प्रकल्पांची शासन नियुक्त एसआयटीमार्फत चौकशी करून प्रकल्प पिडीतांना न्याय न्याय द्यावा, या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर शेतकरी बचाव कृती समिती व मोजक्या पीडित शेतकऱ्यांसह 21 सप्टेंबर पासून बेमुदूत धरणे अंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाची दखल घेऊन चौकशीचे लेखी आदेश न काढल्यास 25 सप्टेंबर पासून आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
गेल्या 4 वर्षापासून सोलर पीडित शेतकरी व शेतकरी बचाव कृती समिती कायदेशीर मार्गाने शासन दरबारी न्याय मागत आहे, मात्र अद्याप न्याय मिळाला नाही. कोरोनाचे नियम दाखवून पोलीस विभाग आंदोलनासाठी 5 व्यक्तींपेक्षा जास्त गर्दी केल्यास गुन्हे दाखल करण्याचे सांगतात. त्यामुळे केवळ कृती समितीचे पदाधिकारी व मोजक्या शेतकऱ्यांसह आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार असल्याचे शेतकरी बचाव कृती समितीने सांगितले.
माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली असता, मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्याचे गोटे यांनी चाळीसगाव येथे पत्रकार परिषदेत सांगितले होते. मात्र अद्याप तसा कुठलाही आदेश अद्याप झालेला नाही.
तुकाराम मुंडेंच्या अध्यक्षतेखाली एसआयटी चौकशीची नेमणूक व्हावी, अशी आग्रही मागणी गोटे यांनी केल्यानंतर तुकाराम मुंडेंनी सुरुवातीला चौकशी समितीचा अध्यक्ष होण्यास होकार दिला होता, परंतू नंतर काही दिवसांनी मुंडेनी नकार दिल्यामुळे समिती गठीत करण्याची प्रक्रीया शासनाकडे प्रलंबित आहे. सरकारने चौकशी लावू नये यासाठी भाजपाच्या नेतृत्वाचा प्रयत्न केले जात असल्याचा दावा शेतकरी बचाव कृती समितीचे भिमराव जाधव यांनी केला आहे.
मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र केले जाणार आहे. तसेच सदर निवेदन विधानसभा उपाध्यक्षांना देण्यात आले आहे. शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने 16 रोजी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची भेट घेत शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्याची मागणी केली. झिरवाळ यांनी या प्रकरणी एसआयटी चौकशी बाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले.