मुंबई : राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. राज्यात गेल्या २४ तासात कोरोनाचे ११ नवे रुग्ण आढळले असून, राज्यातील बाधितांची संख्या तब्बल 63 वर पोहोचली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाय योजना राबविण्यात येत आहे. दरम्यान, कोरोनाच्या विषाणू थंड वातावरणात जास्त काळ टिकतो. त्यामुळे हा धोका पाहता कार्यालय आणि घरातील एसीचा वापर कमी करण्याचं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. या संदर्भात राज्य सरकारने नवीन परिपत्रक जारी केलं आहे. एसीच्या वापरावर सरकारने काही मर्यादा घालण्याचं आवाहन केलं आहे.
थंड वातावरणात कोरोना विषाणूंचं आर्युमान जास्त असतं. याशिवाय एसीच्या हवेतून कोरोनाचे विषाणून जास्तीत जास्त पसरु शकतात. त्याद्वारे इतरांच्या नाका-तोंडावाटे हे विषाणू शरीरात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसी ऐवजी फॅनला जास्त प्राधान्य द्यावं, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं. कडक उन्हामध्ये हे विषाणू फार काळ टिकत नाहीत.