भडगाव :- कुरंगी माहेजी येथील गिरणा नदी पात्रातून रात्रंदिवस वाळू उपसा चालूच असून रात्रभर ओव्हर लोड धंपर द्वारे वाळू वाहतूक सुरू असून या बाबत भडगाव व पाचोरा तालुक्यातील काही सामाजिक व राजकीय कार्यकर्ते कडून आंदोलन करण्यात येणार असून अवैध वाळू उपसा व वाहतूक थांबणार की नाही की अंदोलना नंतरच कार्यवाही होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
एकीकडे शासन पाणी प्रश्न सोडविण्यासाठी जलसंधारणावर कोट्यावधी रुपये खर्च करत आहे. परंतु दुसरीकडे कुरंगी महेजी गिरणा नदीपात्रातून अवैध उत्खनन व वाहतूकीमुळे जलसंधारणाचे नैसर्गिक स्त्रोत असलेल्या गिरणामाईचे अस्तित्व धोक्यात आल्याचे भीषण चित्र दिसत आहे. वाळुचे मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन व वाहतुकीमुळे नदीत पाणी धरून ठेवण्याची, भूगर्भात पाणी थांबण्याची प्रक्रिया नाहीशी होत आहे. वाळू पाण्यास धरून ठेवते व नैसर्गिकरीत्या स्वच्छ करण्याचेही काम करते. तसेच पर्यावरणचेही प्रचंड नुकसान होत आहे. राजरोस सुरू असलेल्या वाळू तस्करीमुळे गुंडगिरी वाढून नदी पात्रालगतच्या गावांमधील सामाजिक सुरक्षितता धोक्यात आली आहे. सामान्य माणसाने अवैध उत्खनन व वाहतूकीविरूध्द आवाज उठविण्याचा प्रयत्न केल्यास दशहतीच्या जोरावर तो दाबला जात आहे.
सरकारने नुकतेच जानेवारी 2018 मध्ये अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी कडक धोरण आणले आहे. त्या परिपत्रकानुसार नदीपात्रात वाळू उत्खनन मानवी पद्धतीनेच करणे अनिवार्य आहे. नदीपात्रात जेसीबी, पोकलेन अशी यंत्रे घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. तसेच नदीपात्रातून केवळ टॅक्टर ट्रॉलीनेच वाहतूक करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. सदर नदीपात्रातील रात्रंदिवस होणार्या वाहतुकीची चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई झाल्यास इतर जिल्ह्यांतील अवैध वाहतुकीला जरब बसेल. म्हणून अशी कारवाई होणे आवश्यक आहे.
वाहतूक रात्रीच
गिरना पात्रातून जेसीबी द्वारे वाळू उचलून ती डंपर द्वारे रात्री दहा ते सकाळी पाच वाजेपर्यंत शेकडो डंपर द्वारे वाहतूक होते . ही वाहतूक पाचोरा बालद मार्गे कजगाव चाळीसगाव मालेगाव नासिक अशी होत असून एका ब्रासच्या पावतीवर अनेक वेळा वाहतूक होत आहे. तसेच रात्री बेरात्री नागरिकांना जीव मुठीत धरून दुचाकी चालावी लागत आहे. या प्रकारा कडे वरिष्ठांनी लक्ष देत कार्यवाही करावी अशी मागणी सुज्ञ नागरिक करीत आहे.