जामनेर (प्रतिनिधी): -जगाचा पोशिंदा शेतकरी राजाला कोरोनाच्या महामारीत सुध्दा वेग वेगळ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच जामनेर तालुक्यातील शेतकरी बांधवाना खरीप पिकांसाठी लागणारा युरीया व १०:२६:२६ खते मिळत नसल्याने खतांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याचे दिसून येत आहे. खाजगी कृषी केन्द्र चालक युरिया दुकानात असून सुद्धा शेतकऱ्यांना देत नाही किंवा युरिया देताना दुसरे अनावश्यक खत देण्याची सक्ती केली जात आहे. तर काही कृषी केन्द्र चालक युरिया देताना अव्वाच्या सव्वा दर सांगून शेतकऱ्यांची लूट करीत आहेत.
तरी तालुक्यातील हा काळाबाजार रोखून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवावी. अन्यथा लूट करणाऱ्या खासगी साठेबाजांवर संभाजी ब्रिगेड आपल्या आक्रमक स्टाईलने बदल घडवेल. असे निवेदन संभाजी ब्रिगेडने नायब तहसीलदार सुभाष कुंभार यांना आज २८ रोजी दिले. यावेळी गोपाल पाटील, मनोज महाले, अमोल पाटील, प्रदीप गायके, विशाल पाटील ,योगेश पाटील, प्रवीण गावंडे, प्रभाकर साळवे, सुनील पाटील, अतूल सोनवणे, अजय मराठे,अजय लवंगे, राम अपार, वैभव पाटील यांच्या सह असंख्य संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते उपस्थित होते.