पारोळा (प्रतिनिधी) : शासनाने हमी भावाने शेतकऱ्यांचा शेती माल खरेदी करणेसाठी जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्र ज्वारी, मका, हरभरा खरेदी केंद्र सुरु केलेली होती. कापूस व मका खरेदी केंद्र सद्या सुरु आहेत. परंतु शासकीय ज्वारी खरेदी केंद्र दि ३० जून २०२० पासून बंद करण्यात आले आहे व मका खरेदी केंद्र दि ३१ जुलै २०२० पर्यंतच सुरु ठेवून मका खरेदी देखील बंद होणार असल्याचे शासनाने निर्देश दिलेले आहेत.
अनेक शेतकऱ्यांचा उत्पादीत शेती माल घरात पडून आहे. त्यामुळे बळीराजाचा उत्पादीत शेती माल विक्रीसाठी फार मोठी समस्या निर्माण होणार आहे. तशातच निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजा चोहो बाजूंनी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. तसेच ज्वारी व मका शासकीय खरेदीची खरेदी केंद्र बंद झाल्यास शेतकऱ्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान व शेतकऱ्यांची गैरसोय देखील होईल. तरी शेतकऱ्यांचे होत असलेले आर्थिक नुकसान, निसर्गाचा लहरीपणा, शेतकऱ्यांची होत असलेली गैरसोय हे लक्षात घेता. शेतकऱ्यांचा आर्थिक हिताचा विचार करून शासनाने ज्वारी व मका खरेदी केंद्रास मुदत वाढ देण्यात यावी अन्यथा प्रति क्विंटल ज्वारी रुपये १०००/- (एक हजार रुपये मात्र) व प्रति क्विंटल मका रुपये ७००/- (सातशे रुपये मात्र) याप्रमाणे अनुदान जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व पणन व सहकार मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कडे केली आहे.