मुंबई । गेल्या काही दिवसांपासून पक्ष नेतृत्वावर नाराज असलेले जळगाव जिल्ह्यातील भाजपचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे भाजपाला रामराम करीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. खडसे भाजपामध्ये नाराज आहेत. वेळोवेळी त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. याशिवाय राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या खडसेंना पक्षात घेण्याच्या अनुकूल प्रतिक्रियांवरून खडसे भाजप सोडणार असल्याच्या चर्चेला अजून हवा मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आज तुळजापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एकनाथ खडसेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
यावर बोलताना शरद पवार म्हणाले, “एकनाथ खडसे महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते होते, अर्थमंत्री होते. आम्हाला शिव्या घालत होते, पण त्यांचं कर्तृत्व, काम आणि खानदेशातील स्थान याकडे दुर्लक्ष करता येणार नाही” असे शरद पवार म्हणाले.
खडसेंना त्यांच्या कष्टाची नोंद घेतली नाही असं वाटतं असेल, तर त्यावेळी कुठं तरी माणूस, जिथं नोंद घेतली जाते तिथे जावं असा विचार करतो. आता एखाद्या पक्षाबद्दल विश्वास वाटत असेल तर त्याला आम्ही काय करावं?, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला. खडसेंनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे असेही शरद पवार म्हणाले.