मुंबई :- काही दिवसांपूर्वी ‘पक्षात राहीन की नाही भरवसा नाही’ असा इशारा देणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी चक्क फडणवीस यांच्यासह भाजपमधील सध्याच्या नेत्याचे कौतुक केले आहे. एवढेच नव्हे, तर पक्षात न दिला जाणारा सन्मान आणि राजकारणातून बाजूला फेकले गेल्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्षरित्या जबाबदार धरणारे खडसे यांनी त्यांचे कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत.
सध्या सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्तानं ते वृत्तवाहिन्यांशी बोलत होते. ‘गेले चार दिवस विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे. तिथं देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील हे विरोधी पक्षाची भूमिका उत्तम मांडत आहेत. सत्ताधाऱ्यांना धारेवर धरताहेत असं चित्र आहे. आम्ही विधानसभेत असतानाही अशाच पद्धतीनं सरकारला जाब विचारायचो,’ असं ते म्हणाले. मागील विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारलं गेल्यानं त्यांच्या नाराजीचा स्फोट झाला. पंकजा मुंडे यांच्यासोबत घेतलेल्या एका मेळाव्यात त्यांनी पक्ष सोडण्याचा इशाराही दिला होता. मात्र, आता अचानक खडसे यांनी फडणवीसांसह इतर नेत्यांचं कौतुक केल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.