नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. जगभरात जवळपास 87 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. भारतातही गेल्या आठवड्यात रुग्णांच्या आकडेवारीत वेगानं वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. भारतात 24 तासांत तब्बल 14 हजार 516 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंतची ही सर्वात जास्त आकडेवारी आहे. यासह एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 4 लाखांच्या घरात गेला आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं पुन्हा एकदा धोक्याचा इशारा दिला आहे.
कोरोनाचा सगळ्या धोक्याच्या आणि दुसऱ्या टप्प्यात पोहोचलो असल्याचं WHO ने म्हटलं आहे. दोन आठवडे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होईल असा इशारा आधीच WHO ने दिला होता. कोरोना आता आणखीन 10 पट धोकादायक झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका सर्वाधिक या टप्प्यात असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयेसस यांनी शुक्रवारी सांगितले की आपण दुसऱ्या आणि धोकादायक टप्प्यावर पोहोचलो आहोत. गुरुवारी एका दिवसात दीड लाखाहून अधिक कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली. त्यातील निम्म्याहून अधिक प्रकरणे अमेरिकेची आहेत. या व्यतिरिक्त आशिया आणि मध्य पूर्व मधूनही बरेच रुग्ण आढळले आहेत.
भारतात गेल्या 24 तासांत 375 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 3 लाख 95 हजार 048 एकूण कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यातील 1 लाख 68 हजार 269 सक्रीय रुग्ण आहेत. तर, 2 लाख 13 हजार 831 रुग्ण निरोगी झाले आहे. आतापर्यंत 12 हजार 948 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे भारताचा रिकव्हरी रेट भारताचा वाढता आहे. रिकव्हरी रेट आता 53.8% हून 54.1% झाला आहे.