फैजपूर प्रतिनिधी : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज जळगाव जिल्हा दौर्यावर आले असून त्यांच्या उपस्थितीत केंद्रीय कृषी कायद्यांच्या दहन आंदोलनासह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, यावेळी नाना पटोले यांनी कृषी कायद्याविरोधात केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. इंग्रजांविरूध्द स्वातंत्र्याचा लढा सुरू असतांना फैजपूर येथे काँग्रेसचे अधिवेशन झाले होते. तर आता देखील कृषी कायद्यांचे दहन याच पवित्र भूमित करण्यात येत आहे. केंद्र सरकारने कृषी कायदे आणून शेतकऱ्यांवर अन्यान केला आहे. हे केंद्र सरकार हे इंग्रजांप्रमाणेच अत्याचारी असल्याचा आरोप, नाना पटोले यांनी केला.
यावेळी काँग्रेसच्या प्रदेशा कार्याध्यक्षा आ. प्रणिती शिंदे, माजी खासदार उल्हासदादा पाटील, आ. शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, फैजपुरात इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. येते ब्रिटीशांच्या विरूध्दचा लढा सुरू असतांना अधिवेशन घेण्यात आले होते. याच पवित्र भूमित आम्ही केंद्र सरकारच्या काळ्या कृषी कायद्यांचे दहन केले. हे तिन्ही कायदे शेतकर्यांच्या विरूध्द असून दिल्ली येथे सहा महिन्यांपासून आंदोलन सुरू असतांनाही पंतप्रधान त्यांच्याशी बोलण्यासाठी तयार नाहीत. अशा अत्याचारी पंतप्रधानांचा निषेध करण्यासाठी आम्ही येथे कायद्यांच्या मसुद्याचे दहन केले असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली.
सध्या कोरोनाची आपत्ती थोडी कमी झाली असल्यामुळे आपण जळगाव जिल्ह्याच्या दौर्यावर आलेलो आहोत. फैजपूर येथे काँग्रेसचे पन्नासावे अधिवेशन घेण्यात आले होते. तेव्हाचा लढा हा इंग्रजांच्या विरूध्द होता. तर सध्याचे केंद्र सरकार हे इंग्रजांप्रमाणेच अत्याचारी असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. देशात सरकार विरूध्द संतप्त भावना असून मोदी सरकारला २०२४ साली जनता धडा शिकवणार असल्याचा इशारा त्यांनी केला. तर, महागाईने सर्वसामान्य नागरिक हे त्रस्त झालेले असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. मार्च महिन्यात देशात सर्वत्र चिता पेटल्या असतांना पंतप्रधान हे पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या प्रचारात लागले होते. सरकारच्या या दंडेलशाहीच्या विरोधात काँग्रेस लढत आहोत.