जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी व मुसळधार पाऊस झाल्याने नदी, नाले यांच्यासह धरणे सुध्दा तुडुंब भरून वाहत आहे .जिल्ह्यातील कित्येक तालुक्यात पावसाचा फटका बसुन मोठया प्रमाणात पिकांचे नुकसान खुप झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावुन नेला.
काल मध्यरात्रीपासुन अजिंठ्याच्या व इतर डोंगराळ भागातील माथ्यावर अतिवृष्टीजन्य पावसाने हजेरी लावल्याने मोठया प्रमाणात नदी नाल्यांना पुर आला . जामनेर शहरातुन वाहणाऱ्या कांग नदीला दुसऱ्यांदा प्रचंड मोठ्या प्रमाणात पुर आला. कांग नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने जामनेर ते भुसावळ नदीवर असलेल्या व नगारखाना ते जामनेर पुरा या भागास जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असुन दोन्ही कडची वाहतुक ठप्प होऊन लांबच लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसत होत्या.
भुसावळकडून येणाऱ्या ट्रक चालकाने वाहत्या पाण्यात ट्रक टाकला. सुदैवाने कोणतीही भीषण घटना घडली नसल्याने नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला. नागरीकांनी नदीचा रुद्र अवतार पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली असुन जामनेरचे तहसिलदार अरुण शेवाळे यांच्यासह प्रशासनाच्या वतीने नदी काठाजवळील रहिवाशांसह इतर नागरीकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.
जामनेर पोलीस स्टेशनचे पो . नि . किरण शिंदे यांनी पुलाच्या दुतर्फा पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. नागरीकांनी पुराच्या पाण्याजवळ गुरे, ढोरे न सोडता पाण्यापासुन दुर राहण्याच्या सुचना करुन नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.