लखनऊ : जगभरात हाहाकार माजवलेल्या करोना व्हायरसने आता भारतातही शिरकाव केला आहे. करोना व्हायरसमुळे उत्तर प्रदेशात दहशतीचं वातावरण आहे. यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून योगी आदित्यनाथ सरकारने राज्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालये २२ मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. लखनऊमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन हा निर्णय घेतला. या निर्णयाची २० मार्चला समीक्षा केली जाईल, त्यानंतर पुढील कार्यवाहीबाबतच्या निर्णय घेतला जाईल.
उत्तर प्रदेशात ११ जणांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे. यात आगरा आणि लखनऊ शहरांचाही समावेश आहे. यापूर्वी उत्तराखंड सरकारनेदेखील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यादरम्यान केवळ बोर्ड परीक्षा सुरू राहणार आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराला महारोगराई किंवा महामारी म्हणून घोषित केले आहे. त्यानंतर दिल्ली, हरयाणा सरकारने सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.