मुख्याध्यापक व शिक्षकांच्या या प्रसंगावधानाने विद्यार्थी बचावले
वरणगाव :- ओझरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत सकाळच्या वेळी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. माध्यान्ह भोजन झाल्यानंतर विद्यार्थी वर्गात गेली दुपारी दोनच्या सुमारास अचानक वेगाने वावटळ आले. यावेळी तीन वर्गांच्या समोरील ओसरी वरील पत्रे उडाली. तसेच वर्गावरील देखील पत्रे ढिली झाले.
यावेळी मुख्याध्यापक गजानन नारखेडे व शिक्षिका ज्योती वानखेडे यांनी प्रसंगावधान राखून वर्गामध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलविले यामुळे इमारतीचे नुकसान झाले असले तरी एकशे पाच विद्यार्थी सुरक्षित आहेत.
या घटनेची माहिती शिक्षण विभागाला मिळाली असता शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान केंद्रप्रमुख नलिनी झांबरे यांनी तात्काळ ओझरखेडा गाठून विद्यार्थ्यांची विचारपूस केली तसेच सर्कल योगिता पाटील व तलाठी कल्पना गोरले यांनी इमारतीचा पंचनाम्याचे काम सुरू केले होते यावेळी सरपंच संगीता पाटील उपसरपंच किरण पाटील ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मदतीला धावून आले