पारोळा (प्रतिनिधी) : कृषि विभागाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून पौष्टिक तृणधान्य विकास कार्यक्रम अंतर्गत रब्बी ज्वारी पिकाच्या प्रात्यक्षिकांचे नियोजन करून शेतकऱ्यांनी उत्पन्न दुप्पट करण्याबरोबरच उत्पादन खर्च कमी करण्याचे धडे कृषि सहाय्यक सुरेश लांडगे यांनी दिले.
याबाबत सविस्तर असे की,पारोळा तालुक्यातील मौजे रत्नापिंप्री येथे कृषि विभागामार्फत रब्बी ज्वारीच्या प्रात्यक्षिक प्रकल्पाचे नियोजन करण्यात येऊन ग्रामपंचायत कार्यालयात निवडलेल्या लाभार्थ्यांना रब्बी ज्वारीच्या फुले रेवती या नवीन सुधारित वाणांचे बियाणे वाटप करण्यात आले. यात पीक प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून सुधारीत वाणाचा वापर,खोडकिडीचे व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, अन्नद्रव्ये व्यवस्थापन,निंबोळी अर्क यासारख्या बायोएजंट चा वापर करणे, त्याचप्रमाणे विकेल ते पिकेल या शासनाच्या महत्वाकांक्षी संकल्पनेनुसार विक्री व्यवस्था या बाबीतून शेती उत्पन्न दुप्पट करण्याबरोबरच उत्पादन खर्च कमी करणे गरजेचे असल्याची माहिती कृषी सहाय्यक सुरेश लांडगे यांनी दिली.यासोबत विशेष बाब म्हणून शेतकऱ्यांसाठी पिकाच्या कालावधीत प्रबोधन होण्याच्या दृष्टीने शेतकरी शेतीशाळा घेण्यात येणार आहे.
यावेळी सुरेश पाटील,राजेंद्र पाटील,कृषिमित्र सुनिल वानखेडे, युवराज पाटील,तुकाराम पाटील,विनायक पाटील,रवींद्र पाटील,ज्ञानेश्वर भागवत व इतर शेतकरी उपस्थित होते.