मुंबई | वृत्तसंस्था
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारताच निर्णयांचा धडाका सुरू केला आहे. आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्यात आली आहे. याचं पुनर्परीक्षण केल्याशिवाय पुढील काम होणार नाही, असे निर्देश दिले असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. कोणतीही विकासकामे रखडणार नाहीत, पण आपलं वैभव गमावून विकासकामे होणार नाहीत, असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. ही स्थगिती फक्त कारशेडच्या कामाला आहे. त्यामुळे मेट्रोचं काम सुरुच राहणार आहे.
विधीमंडळ वार्ताहर कक्षात उद्धव ठाकरेंनी वार्तालाप केला. यावेळी सरकारची पुढची ध्येयधोरणं आणि दिशा त्यांनी स्पष्ट केली. ‘मुख्यमंत्री म्हणून अनपेक्षितपणे आलोय. हे तीन पक्षांचं सरकार आहे. विविध अडचणींचा सामना आम्हाला करायचाय. आतापर्यंत दोन ते तीन वेळाच मंत्रालयात आलोय. प्रथा, परंपरा माहित नसताना शिवधनुष्य उचललं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ‘सचिवांसोबत ओळख झाली. हे आपल्या सर्वांचं सरकार आहे, जनतेशी नम्रपणाने वागणारं सरकार आहे. कराच्या रुपाने जो पैसा आपल्याकडे येतो, तो योग्य ठिकाणी वापरला पाहिजे, जनतेच्या पैशाची उधळपट्टी होणार नाही. सगळी कामं करण्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या खिशातला पैसा आहे. मुंबईत जन्मलेला पहिला मुख्यमंत्री मी आहे. माझ्या मुंबईसाठी काय करायचंय त्याचाही विचार सुरु आहे. शेतकऱ्यांनाही दिलेला शब्द पाळायचा आहे. आरे कारशेडला स्थगिती दिलेली आहे. कोणतंच विकासकाम रखडणार नाही, पण आपल्या हाताने आपलं वैभव आपण गमावत असू तर तो विकास नाही. याचा पुनर्विचार होत नाही तोपर्यंत आरेचं काम होणार नाही,’ असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. ऐन निवडणुकीच्या काळात आरे कारशेडचा मुद्दा चांगलाच गाजला होता.