नवी दिल्ली – सरलेल्या बारा महिन्यात खाद्य तेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास होत होता. गेल्या काही आठवड्यात खाद्य तेलाच्या दरात काही प्रमाणात घट होत होती. त्यातच आता केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्कात मोठी घट केली आहे. सरकारने पाम तेलावरील आयात शुल्कात प्रती टन ८००० रुपयांची (११२ डॉलर) कपात केली आहे. त्यामुळे आगामी काळात खाद्यतेलाचे दर आणखी कमी होण्याची शक्यता बळावली आहे.
भारतातील खाद्य तेलाचे उत्पादन गरजेपेक्षा कितीतरी कमी आहे. त्यामुळे भारताला बरेच खाद्यतेल आयात करावे लागते. मात्र आयात खाद्यतेलावर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क असल्यामुळे गेल्या काही महिन्यापासून खाद्य तेलाच्या किमती वाढल्या होत्या. मात्र केंद्र सरकारने आज घेतलेल्या या निर्णयामुळे खाद्य तेलाच्या किमती कमी होण्यास मदत होणार असल्याचे खाद्यतेलाच्या आयातदार संघटनेने म्हटले आहे.
एक वर्षांमध्ये खाद्य तेलाचे दर जवळजवळ दुपटीने वाढले आहेत. केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात सांगितले होते की, खाद्यतेलाचे दर कमी होत आहेत. सरकार मध्यम, लघू आणि दीर्घ पल्ल्याच्या उपायोजना करून खाद्यतेलाचे दर आवाक्यात ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. भारतात दरवर्षी एकूण गरजेच्या ६० टक्के खाद्यतेल आयात होते. हे प्रमाण २५ ते ३० टक्क्यांनी कमी झाले आहे. यामुळे तीन महिने आधी सरासरी ११० ते १२५ रुपयांदरम्यान असलेले खाद्यतेल आता १८०-२०० रुपयांच्या घरांत गेले आहे. ‘खाद्यतेलाची आयात घटली आहे. खाद्य तेलावर पाच टक्के जीएसटीदेखील आकारला जात आहे. त्यामुळे खाद्य तेल विक्रमी पातळीवर गेले आहे. सध्या पाम तेलाचा भाव प्रती लीटर १२० ते १३० रुपये आहे. सोयाबीन तेलाचा भाव १४० ते १५० रुपये आहे. सनफ्लॉवर तेलाचा भाव १५० ते १७० रुपये आहे. तर शेंगदाणा तेलाने २०० रुपयांची पातळी केव्हाच ओलांडली आहे.