दोन लाख 24 हजार 220 रुपयांचे बियाणे जप्त
अमळनेर : कृषी विभाग व पोलिसांच्या संयुक्त पथकाने आज पहाटे सुमारे सव्वादोन लाखांचे बोगस बियाणे आज जप्त केले. याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले आहे.
शहरात बोगस बियाणे विक्रीसाठी येत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. या पार्श्वभूमीवर आज पहाटे तीनच्या सुमारास पोलिस उपअधीक्षक रफीक शेख, पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर, नाईक विजय साळुंखे, रवींद्र पाटील, योगेश महाजन, बापू पारधी, संतोष पाटील व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी चोपडा रस्त्यावरून चार संशयितांसह दोन लाख 24 हजार 220 रुपयांचे बियाणे जप्त केले. दिनेश शंकर महाजन, किशोर शामराव महाजन, नितीन रमेश चव्हाण, संदीप मधुकर साळी या चार संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे. शेतकऱ्यांची लागवडीसाठी लगबग सुरू आहे. यामुळे आता बोगस बियाणांचे पेव फुटले आहे. कृषी विभागानेही सतर्क राहून कृषी चालकांचीही चौकशी करून बोगस बियाणाबाबत जागरूक राहाणे गरजेचे आहे. अशी अपेक्षा व्यक्त होत आहे .