अमरावती (प्रतिनिधी) : उन्हाची तीव्रता अधिक असणाऱ्या मे महिन्यात शुक्रवारी अमरावती जिल्ह्या सह ग्रामीण भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाचे आगमन झाले .पावसामुळे रब्बी पिकातील कांदा, संत्रा, व भाजिपाला पिकाचे नुकसान झाले आहे .
अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. त्यानुसार शुक्रवारी सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी पाच वाजता च्या सुमारास आकाशात काळे ढग जमण्यास सुरुवात झाली. जवळपास तीस मिनिटे सोसाट्याच्या वाऱ्यासह ढगांचा कडकडाट सुरु झाला. यानंतर पावसाला सुरुवात झाली. जवळपास वीस मिनिटे पावसाची रिपरिप सुरू होती.अचानक आलेल्या पावसाने वातावरणात थंडावा निर्माण केला होता. उन्हाच्या चटक्यांनी त्रस्त झालेल्या नागरिकांना अचानक झालेल्या पावसाने थोडाफार दिलासा मिळाला.
मात्र, अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील सध्या बाजारात दाखल होण्याच्या तयारीत असलेल्या कांदा पिकाचे नुकसान झाले. याशिवाय शेतातील भाजी पाला, संत्रा आदी पिकांना देखील अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.