मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी अखेर आपला राजीनामा दिला आहे. संजय राठोड यांनी आपल्या पत्नीसह वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा दिला आहे.
विरोधी पक्ष भाजपने हे प्रकरण लावून धरत होतं. 8 फेब्रुवारीला पुण्यातील महंमदवाडी येथील एका सोसायटीमध्ये पूजा चव्हाणने आत्महत्या केली होती. गेल्या त्यानंतर या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच नाव समोर आलं होतं. मात्र सोशल माध्यमांवर काही ऑडिओ क्लिप आणि फोटो व्हायरल झाले होते. त्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेत संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला पण मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक दबाव झुगारुन लावत राठोड यांचा राजीनामा घेतला. त्यामुळे भाजपच्या विरोधानंतर आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राठोड यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला आहे. याआधी या प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांवर दबाव आणला जात होता. त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह केलं जात होतं. मात्र आपल्या संयमी स्वभावासाठी ओळखले जाणाऱ्या उद्धव ठाकरेंनी राजीनामा घेत टीकाकारांच्या टीकेला पुर्णविराम दिला आहे.
दरम्यान, सरकारने राठोडांचा राजीनामा घेतला नाही तर अर्थसंकल्पीय अधिवेशन होऊ देणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी दिला होता. तर राठोडांनी राजीनामा दिला नाही तर शक्ती कायद्याच्या संयुक्त समितीतून भाजपचे सर्व सदस्य राजीनामे देतील, असंही फडणवीस म्हणाले होते.