मुंबई : पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी याला अखेर अखेर आज विशेष न्यायालयाने फरार घोषित केले आहे.
विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. सी. बर्डे यांनी या प्रकरणाची सुनावणी केली. सुनावणीत न्यायाधिशांनी मोदी याच्यासह त्याचा भाऊ नीशल आणि सहकारी सुभाष परब या प्रकरणातील आणखी दोन आरोपींनाही जानेवारीपर्यंत न्यायालयात हजर रहा अन्यथा त्यांनादेखील फरार घोषित करण्यात येणार असल्याचा इशारा दिला होता. कायद्यानुसार न्यायालयाने आरोपीला असा इशारा देत दिलेल्या मुदतीत आरोपीने न्यायालयासमोर हजर होणे आवश्यक आहे. परंतु त्यानंतरही तो न्यायालयासमोर हजर झाला नाही, तर त्याला फरारी आरोपी जाहीर केले जाते.
एवढेच नव्हे, तर आरोपीला फरारी घोषित केल्यानंतर तपास यंत्रणा भारतातील त्याच्या मालकीच्या मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करू शकते. मोदी आणि त्याचा काका मेहुल चोक्सी दोघेही पळून गेले आहेत. मोदीला लंडन पोलिसांनी अटक केली असून त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया प्रलंबित आहे. नीशल आणि सुभाष परब यांचा ठावठिकाणा नाही.