नवी दिल्ली: अयोध्या प्रकरणाची सुनावणी अखेर पूर्ण झाली. या प्रकरणी न्यायालयानं निकाल राखून ठेवला आहे. गेल्या ४० दिवसांपासून अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू होता. अखेर आज या प्रकरणातील शेवटचा युक्तिवाद पूर्ण झाला. २३ दिवसानंतर म्हणजेच येत्या १७ नोव्हेंबरला ऐतिहासिक फैसला सुनावण्यात येणार आहे. आज तासभर आधीच सुप्रीम कोर्टात या खटल्याची सुनावणी पूर्ण करण्यात आल्यानंतर १७ नोव्हेंबरला फैसला सुणावण्यात येणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने नमूद केले आहे.
अयोध्येतील ऐतिहासिक जमीन वाद प्रकरणात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील ५ सदस्यीय खंडपीठानं सुनावणी घेतली. रंजन गोगोई १८ नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्याआधी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येऊ शकतो. आज सुनावणीच्या अखेरच्या दिवशी हिंदू आणि मुस्लिम पक्षकारांमध्ये युक्तिवादादरम्यान शाब्दिक चकमक झाली. यावेळी मुस्लिम पक्षकारांच्या वकिलानं हिंदू पक्षाच्या वतीनं जमा करण्यात आलेला नकाशा फाडला.