मलिकांविरोधात मानहानीचा दावा; वानखेडेंच्या वडिलांकडून 1.25 कोटींची मागणी

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यात चांगलेच टीकास्त्र रंगले आहे. अल्पसंख्याक विकास कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या वडिलांनी मानहानीचा दावा ठोकला आहे.

ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्याविरोधात 1.25 कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे.

नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन एकामागून एक गौप्यस्फोट करण्याचा धडाका सुरुच ठेवला आहे. समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांच्या जात प्रमाणपत्रावर त्यांनी संशय व्यक्त केला होता. या प्रकरणी ज्ञानदेव वानखेडे यांनी बॉम्बे हायकोर्टात धाव घेत अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे.

प्रसारमाध्यमे, सोशल मीडियामध्ये आपल्या कुटुंबियांबद्दल प्रसारित होणाऱ्या वृत्तांवर बंदी यावी, यासाठी ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. अर्शद शेख हे त्यांचे वकील आहेत. सोमवारी याबाबत कोर्टात सुनावणी होणार आहे.

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांच्या जातीच्या प्रमाणपत्रावर संशय व्यक्त केल्यानंतर समीर वानखेडे दिल्लीत गेले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्षांची भेट घेतली होती. आयोगाच्या अध्यक्षांना सर्व कागदपत्रे सादरही केली होती. आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे. मात्र वानखेडेंवर आरोपांवर आरोप होत आहेत.

नवाब मलिक यांनी वानखेडे यांची जात आणि कथित धर्मांतरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मीडियाशी संवाद साधला होता. मी अनुसूचित जमाती वर्गातील आहे आणि माझा मुलगाही अनुसूचित जमाती वर्गातील आहे. मी मुस्लिम महिलेशी लग्न केलं. पण मुस्लिम धर्माशी आमचा काहीच संबंध नाही, असं ज्ञानदेव वानखेडे यांनी स्पष्ट केलं होतं. दुसरीकडे, समीर वानखेडे मुस्लिम असल्यानेच त्यांच्याशी माझ्या मुलीने लग्न केल्याचा दावा समीर वानखेडे यांच्या पहिल्या बायकोच्या वडिलांनी केला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.