ऐनपुर ता. रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
ऐनपुर येथील बस स्थानकापासून ख़िरडी रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे झाल्याने त्याठिकाणी पावसाचे पाणी साचुन काही ठिकाणी जलमय खड्डे झाले असून वाहनधारकांसह नागरिकांचे हाल होत आहेत.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील ऐनपुर येथील बस स्थानकापासून ख़िरडी रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी गेल्या महिन्यापासुन खड्डे झालेले होते. तसेच गेल्या पावसाळ्यात या खड्यांमधे पावसाचे पाणी साचुन त्याठिकाणी जलमय खड्डे होऊन अक्षरशः वाहन धारकांचे हाल होत होते. दोन-तीन महिन्याआधी या रस्त्यावर असलेले खड्डे मुरुम टाकून थातुर-मातुर बुजन्यात आले होते. तरी ‘जैसे थे’ ची परिस्थिति झाली असल्याचे पावसात दिसून आले, या समस्येमुळे वाहन धारक तसेच पायी चालणाऱ्या नागरिकांना कमालीची कसरत करावी लागत आहे.
हीच अवस्था निम्बोल रस्त्याने सुद्धा दिसून येते, काही ठिकाणी तर पावसाचे पाणी साचल्यामुळे चालणे ही मुश्किल होते, या समस्येमुळे नागरिक त्रस्त झालेले आहे. यासमस्येकडे संबंधित विभाग लक्ष देईल का? ही समस्या सुटायला मुहूर्त निघणार कधी असा प्रश्न निर्माण होत आहे.