मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नेहमी आपल्या कोणत्या ना कोणत्या वक्तव्यामुळे अडचणीत सापडतात. आता पुन्हा एकदा त्यांच्या नव्या वक्तव्यामुळे ते वादात सापडले आहेत. ‘लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाचा एकही उमेदवार निवडून येऊ नये, यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची यंत्रणा काम करत होती’, असा दावा संजय राऊत यांनी केला. यावर शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी जोरदार पलटवार केला आहे. तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात असंतोष आहे, असा मोठा दावाही शिरसाट यांनी केला.
संजय शिरसाट म्हणाले की, “संजय राऊत यांना आता काही कामे राहिली नाहीत. त्यांना आता काही स्फोटक वक्तव्ये करायची आहेत, म्हणून ते करतात. अजित पवारांचे उमेदवार पाडायचे काय कारण आहे? त्यांचे पाच उमेदवार होते, शिरूरच्या जागेवरती उमेदवार आमच्या कडचा दिला आहे. सगळ्यात जास्त सभा मुख्यमंत्र्यांनी या पाचही मतदार संघात केल्या आहेत,” असा पलटवार संजय शिरसाट यांनी केला.
तसेच “राष्ट्रवादी शरद पवार गटात असंतोष माजला आहे. सुप्रिया सुळे व रोहित पवार यांची हुकुमशाही सुरु आहे. ज्यांनी शरद पवारांसोबत कामे केली आहेत, ते आता रोहित पवारांचे ऐकतील का? तिकडे गोंधळाची स्थिती आहे. रोहित पवार आणि सुप्रिया सुळेंना सर्व वैतागले आहेत. प्रदेशाध्यक्ष एक पाऊल टाकून आहेत. ते कधी येतील सांगता येत नाही.” तसेच 4 तारखेला आघाडी साफ झालेली दिसेल. 4 जूननंतर वर्षावर वारे वाहतील, असा खळबळजनक दावाही शिरसाट यांनी केला.