अमित शहा यांच्यासोबत रात्री उशिरापर्यंत महा युती नेत्यांची बैठक
नवी दिल्ली ;- भाजपाला जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रात लढवायच्या आहेत तर एकनाथ शिंदे-अजित पवार हेदेखील जागांवरील दावा सोडायला तयार नाहीत. काल रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठक झाली असून या बैठकीत जवळपास जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक दिग्गजांना बाजूला करण्यात आले. आता दुसऱ्या यादीबाबतही चर्चा रंगली आहे. दुसऱ्या यादीत पक्ष मोठ्या प्रमाणात तिकीट कापू शकतो, असे मानले जात आहे.
भाजपच्या जागावाटपाच्या सूत्रावर तडजोड झाली. यामुळे भाजपच्या पुढील यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश केला जाऊ शकतो. बैठकीत अजित पवार यांना 4 जागा देण्याचे निश्चित करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 10 जागा देण्यात येणार आहे. उर्वरित जागेवर भाजप निवडणूक लढवणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भाजप नेते अमित शहा यांच्यासोबत शुक्रवारी मध्यरात्री दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत राज्याच्या महायुतीतील जागावाटपाचा तिढा सोडवण्यात यश आले.
सध्या लोकसभेच्या जागावाटपावरुन महायुतीत खलबते सुरू असल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे काही उमेदवार बदलण्याची केल्याची सूचना गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे.
अजित पवारांना तीन ते चार जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटाला 10 ते 12 जागा मिळण्याची शक्यता आहे. वायव्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, रामटेक, पालघर, हातकणंगले या जागा भाजप स्वतःकडे घेऊ शकते, अशी सुत्रांची माहिती आहे. अजित पवार गटाला बारामती, शिरुर, रायगड, परभणी या जागा मिळू शकतात, तर शिर्डी आणि यवतमाळचे उमेदवार बदलले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.