केळीच्या बागेत वाघाची विश्रांती !

0

कु-हा काकोडा, लोकशाही न्यूज नेटवर्क

सुकळी येथील केळीच्या बागेत थंड वातावरण असल्यामुळे वाघाची विश्रांती नागरिकांनी मोबाईलमध्ये वाघाला कैद केले. पट्टेदार वाघांसाठी सुप्रसिद्ध असलेल्या (वढोदा वनक्षेत्र) आई मुक्ताई-भवानी व्याघ्र प्रकल्पातील डोलारखेडा वनपरीमंडळातील सुकळी नियतक्षेत्र कं.नं.५४० लगतच्या शेतात २८ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास एका पट्टेदार वाघाचे दर्शन झाले असून शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथील शेतकरी पंडीत शिवाजी धनगर यांचे वनहद्दीलगत शेती असुन शेतात संदिप चौधरी या शेतकऱ्याची बटाईची केळी बाग लावली आहे. नेहमीप्रमाणे सायंकाळी संदिप चौधरी भावासह शेतात गेले असता बागेत एक ठिकाणी पट्टेदार वाघ बसलेल्या अवस्थेत दिसून आला. मात्र आजपर्यंत वाघाच्या पाऊल खुणा फक्त शेतकऱ्यांच्या व मजुरांच्या नजरेत पडत होत्या, मात्र आज प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतामध्ये समोरासमोर अवघ्या काही अंतरावर वाघ बसलेला दिसल्याबरोबर शेतकऱ्यांची भांबेरी उडाली.

त्यानंतर तेथुन सुटका करून घेतली व त्यांनी ताबडतोब वनकर्मचाऱ्यांना ही माहीती दिली. प्रभारी वनपरीक्षेत्र अधिकारी ऐ.आर. बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल पी.टी. पाटील, वनरक्षक जी.बी. गोसावी, वनमजुर सिद्धार्थ थाटे यांच्यासह विनोद बेलदार, विनोद भोई आदींनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन अवघ्या अंतरावरून वाघ समोरा-समोर आल्याने मौत का कुवामध्ये असल्याचा अनुभव घेतला.

तापमानात झालेल्या प्रचंड उष्णता वाढीमुळे तापमान असह्य झाल्यामुळे सरंक्षणार्थ मांसभक्षी वन्यप्राणी परीसरातील केळी बागात थंड वातावरण असलेल्या ठिकाणी आसरा घेत आहे. मात्र वाघांच्या वास्तव्यामुळे शेतमजूर शेतात काम करण्यास हिम्मत करत नसुन शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. शेतकरी हित लक्षात घेऊन वनविभागाने एक प्रशिक्षित टिम नेमुन द्यावी व शेतकरी यांना याबाबतीत सहकार्य करावे अशी मागणी समोर येत आहे.

चार वर्षापुर्वी याच परीसरातील डोलारखेडा येथील शेतकऱ्याचा बळी वाघाने घेतला होता. यामुळे वन हद्दीलगतच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परीसरात एकापेक्षा जास्त वाघ असुन चार वर्षापुर्वी सुकळी शिवारातील केळीबागेत एक वयोवृध्द वाघिणीचा मृत्यु झाला होता. आठ-दहा वाघांचा मुक्त संचार असुन अधिवास कायम आहे. हे जिल्हावासियांसाठी अभिमानाची बाब आहे. संवेदनशील भागात वनपरीक्षेत्र अधिकारी नसुन प्रभारी वनाधिकारी यांच्याकडे पदभार देऊन वनविभाग एकप्रकारे दुर्लक्षच करीत आहे.

गत सुमारे आठ-दहा महिन्यांपासुन जिल्ह्याचे वैभव असलेल्या वनक्षेत्रात वनक्षेत्रपाल नसुन प्रभारी कार्यभार आहे. वनविभागाने एक अनुभवी कर्तव्यदक्ष वनक्षेत्रपाल या व्याघ्र अधिवास क्षेत्रासाठी नेमावे अशी मागणी स्थानिक लोकांची आहे. मात्र वनविभाग याकडे हेतुपुरस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. तसेच यासाठी ठोस उपाययोजना करण्याची नितांत गरज असुन लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रित करुन किमान एक कर्तव्यदक्ष अधिकारीसाठी शासन दरबारी वजन खर्ची करावे अशी मागणी स्थानिकांची आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.