मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात कांदा बाजारभावात झालेल्या घसरणीवर शासनाकडून करण्यात आलेल्या ३५० रुपयांच्या अनुदानाचे वाटप लवकरच सुरू होणार असून, उशिरा खरीप कांदा खरेदी केंद्रात विक्री झालेल्या कांद्याला अनुदान देण्यात येणार आहे. २०० क्विंटल प्रतिशेतकरी या मर्यादेत ३५० रुपयांचे अनुदान वाटप केले जाणार असल्याचा शासन आदेश काढण्यात आला आहे. हे अनुदान ३० दिवसांत वितरित करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे.
कांदा अनुदानासाठी दोन लाख शेतकरी पात्र ठरतील, त्यांच्यासाठी ३९६ कोटी रुपये अपेक्षित असल्याचा सरकारचा अंदाज आहे.
लेट खरीप हंगामात कांद्याचे भाव प्रचंड कोसळल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत आला होता. अर्थसंकल्पी अधिवेशनात कांद्यावरून चांगलाच गोंधळ झाला होता.
त्यामुळे सरकारने कांद्याचे घसरलेले दर आणि त्यावरील उपाययोजनांसाठी निवृत्त पणन संचालक डॉ. सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती.
या समितीने ३०० आणि २०० रुपये अनुदानाचा पर्याय सरकारपुढे ठेवला होता. यापैकी सरकारने ३०० रुपये अनुदानाची घोषणा केली होती. दरम्यान, नाशिक येथून भारतीय किसान सभेचा लाँग मार्च निघाला होता. या मोर्चाच्या मागण्यांमधील कांदा अनुदान ही महत्त्वाची मागणी होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मोर्चाच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना अनुदानात ५० रुपयांची वाढ केली होती.