जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. आता सगळ्यांना प्रतिक्षा आहे ती जोरदार पावसाची. अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मात्र अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. शहरी भागात देखील पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत.
दरम्यान काल मंगळवार रोजी सकाळी चार वाजेच्या सुमारास वीज पडून चार जनावरे ठार झाल्याची घटना शेंदुर्णीत घडली. शेंदुर्णी शिवारातील 344 गट नंबर असलेल्या ईश्वर विठ्ठल पाटील यांच्या शेतात तीन वर्षा पासून टेंभी या ठिकाणी मेला मोहन भरवाड हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. त्यांच्याकडे देशी गीर जातीच्या गाई बैल यांचा कळप आहे. त्याच्यावर ते आपल्या कुटुंबाची गुजराण करतात.
दरम्यान मंगळवारी सकाळी झालेल्या विजेच्या कडकडाटासह पावसामध्ये त्यांच्या दोन गीर जातीचे बैल आणि दोन गीर जातीच्या गायी यांच्यावर वीज पडून मृत्यू झाला. सकाळी तलाठी नाईक सुरेश कुमावत तसेच पहूर येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. राठोड व सुपडू मोरे यांनी जाऊन पंचनामा केला.
सदर व्यक्तीचे जवळपास साडेतीन लाखाचे नुकसान झाले असून मेला भरवाड यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली. त्या वेळी सागर पाटील, श्रीकृष्ण चौधरी, युवराज सूर्यवंशी, ईश्वर पाटील, संजय राजपूत, पिंटू पाटील हे उपस्थित होते.
यासह राज्यातही अनेक ठिकाणी पावसाने जोरदार झोडपले. नंदुरबार शहरासह परिसरामध्ये जोरदार पाऊस होत आहे. वेळेवर पाऊस येत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नंदुरबार शहरात आणि परिसरात होत असलेल्या पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. मे महिन्यात लागवड केलेल्या पिकांना या पावसाचा फायदा होणार आहे. शहरात आणि परिसरात उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय. पावसामुळे अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
महाराष्ट्र आणि गुजरात सीमा लगत असलेल्या भागात जोरदार पाऊस होत आहे. ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असं कृषी विभागाने आवाहन केले आहे. आज आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे पिकांना काहीसा फायदा होणार आहे.
हिंगोली जिल्ह्याच्या अनेक भागात धुंवाधार पावसाला सुरुवात झाली आहे. विजांच्या कडकडासह पाऊस पडत आहे. मिरग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. उकड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
संगमनेर तालुक्यासह देखील पावसाने जोरदार हजेरी लावलीये. गेल्या तासाभरापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बळीराजाला दिलासा मिळाला आहे. जोरदार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. घरात गुडघाभर पाणी साचल्यानं अनेकांची धावपळ झाली. पावसाचा जोर कायम असल्यानं अनेक ठिकाणी पाणी साठलं आहे.