जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगावचा (Jalgaon) उन्हाळा आपल्या सर्वांसाठीच असय्य असतो. आणि त्यात पाणीटंचाईच्या समस्येला सर्व नागरिकांना तोंड द्यावे लागते, त्यातच शहराला २४ तास पाणीपुरवठ्यासाठी जळगाव महापालिकेतर्फे राबविण्यात आलेल्या अमृत योजनेची मुख्य जलवाहिनी मेहरुण परिसरात सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास फुटून लाखो लिटर पाण्याची नासाडी झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मेहरूणमधील (Mehrun) अशोक किराणा दुकानासमोर मुख्य जलवाहिनीचा व्हॉल्व फुटला. त्यातून तब्बल साडेतीन तास पाण्याची नासाडी झाली. याबाबत मेहरूण परिसरातील नागरिकांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला वारंवार संपर्क केला. मात्र, कोणाचाही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली.
पाच वर्षांपासून जळगावकर अमृत योजनेच्या (Amrit Yojana) नावाखाली नको-नको तो त्रास भोगतोय.जेमतेम यंदा तरी अमृत योजनेतून पिण्यासाठी पाणी मिळेल, अशा अपेक्षा होती. योजना पूर्णत्वास आली असून, घराघरांत पाणीपुरवठा होईल, अशी तयारी असताना, योजनेंतर्गत टाकलेली मुख्य भूमिगत जलवाहिनीसह उपजोडण्या वारंवार खंडित होऊन पाणीपुरवठा विस्कळित होत आहे. त्यामुळे जळगाव वासियांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.