मुंबई | लोकशाही न्यूज नेटवर्क
कोकण आणि घाटमाथ्यावर आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान तज्ञांकडून वर्तविण्यात आली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसह सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा तर पुणे जिल्ह्याचा घाटमाथा, पालघर, अमरावती आणि अकोला जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा आहे.
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.
जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट)
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर.
———————–
जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट)
पालघर, पुणे, अकोला, अमरावती.
————————–
वादळी पावसाचा इशारा (यलो अलर्ट)
ठाणे, मुंबई, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, बुलडाणा, वाशीम, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
————————–
अरबी समुद्रात उत्तरेत नैऋत्य मोसमी पाऊस पुढे सरकला असून राज्यभर मान्सून सक्रिय झाला आहे. परिणामी वादळी पावसासह विजांचा कडकडाट तसेच हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस येत्या पाच दिवसात राज्यभर राहणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा विभागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राज्यात कोकणासह मुंबई येत्या ४ ते ५ दिवसांत वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस राहणार असून बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. येत्या तीन दिवसात पुण्यासह सातारा जिल्ह्यांमध्येही जोरदार पाऊस असेल. विदर्भात हलक्या व मध्यम सरींचा पाऊस पुढील पाच दिवस राहणार असून बहुतांश ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.