जिल्ह्यात उष्णतेची लाट; उष्माघातापासून असा करा बचाव

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात येत्या तीन दिवसात म्हणजेच दि. २९ ते ३१ मार्च दरम्यान उष्णतेची लाट असणार आहे. या उष्माघातापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव, टंचाई शाखा – आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे करण्यात आले आहे.

उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी सर्व संबंधित विभाग, स्थानिक पुढारी व सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

काय करावे

1. तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे.
2. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
3. बाहेर जातांना गॉगल्स, छत्री / टोपी, बुट व चप्पलचा वापर करण्यात यावा.
4. प्रवास करतांना पाण्याची बाटली सोबत ठेवावी.
5. उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करण्यात यावा तसेच ओल्या कपडयांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा. 6. शरीरातील पाण्याचा प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू – पाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करण्यात यावा.
7. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावित व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.
8. गुरांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी घ्यावे.
9. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघडया ठेवण्यात याव्यात.
10. पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे.
11. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.
12. सूर्य प्रकाशाच्या थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सुचित करण्यात यावे.
13. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा.
14. बाहेर कामकाज करीत असताना मध्ये मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करण्यात यावा.
15. गरोदर कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी.
16. रस्ताच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावेत.
17. जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावा.

काय करु नये

1. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये.
2. दुपारी 12.00 ते 3.30 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे.
3. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
4. बाहेर तापमान अधिक असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत. दुपारी 12.00 ते 03.30 या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे.
5. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडकी उघडी ठेवण्यात यावी.

Leave A Reply

Your email address will not be published.