नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची नासधूस करीत त्यावर ग्राफीटी केली असल्याचा धक्कादायक प्रकार इटली करण्यात आला आहे. या पुतळ्यावर गांधी आणि मोदी तसेच खलिस्तानवादी हरिदीप सिंह निज्जर याची नावांची ग्राफीटी केल्याचे आढळले आहे. जी-7 शिखर परिषदे दरम्यान या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते. दरम्यान, या प्रकरणाचा भारताने तीव्र निषेध नोंदविला असून या प्रकरणी इटालियन अधिकाऱ्यांना तक्रार केली असून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
खलिस्तानवादी हरिदीप सिंह निज्जर याची कॅनडात हत्या झाल्यानंतर भारत आणि कॅनडा या दोन देशांचे संबंध तणावपूर्ण झाले होते. या प्रकरणात भारतीय सुरक्षा यंत्रणावर संशय व्यक्त करण्यात आला होता. भारताने यात आपला कोणताही सहभाग नसल्याचे स्पष्ट केले होते. तरी या प्रकरणाने दोन्ही देशाचे संबंध बिघडले होते. त्यातच आता इटलीच्या दौऱ्यावर जाणार असताना महात्मा गांधी यांचा पुतळ्याची नासधुस केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
खलिस्तानी दहशतवाद्यांनी पुतळ्याच्या पायथ्याशी ग्राफीटी काढली आहे. तसेच खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरचा पुतळ्याच्या चौथऱ्यावर संदर्भ देखील लिहिला आहे. भारताने संबंधित इटालियन अधिकाऱ्यांकडे या प्रकरणी आक्षेप नोंदवित कारवाई करण्याची मागणी केली आहे, असे परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
ही घटना दक्षिण इटलीमधील ब्रिंडिसी नावाच्या गावातील आहे. इटालियन स्थानिक अधिकाऱ्यांनी बस्टच्या पायथ्याशी साफसफाई केली आहे. आम्ही आमची तक्रार त्यांच्याकडे केली आहे. या प्रकाराला जे जबाबदार आहेत त्यांचा शोध घ्या आणि स्थानिक कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी आम्ही केल्याचे इटलीतील भारताचे राजदूत वाणी राव यांनी सांगितले आहे.